Tuesday 7 May 2013

मुलाखतीची तयारी

लेखी परीक्षांचे अडथळे पार केल्यानंतर मुलाखतीला सामोरे जाताना व्यक्तिगत माहिती संदर्भातील प्रश्न जसे महत्त्वाचे असतात, तसेच भोवताली घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनांविषयीचे उमेदवाराचे मत व भूमिकाही महत्त्वाची ठरते. स्पर्धापरीक्षेतील मुलाखतीची तयारी कशी करावी, याविषयी..

मुलाखत हा केंद्र लोकसेवा आयोग (यूपीएससी) आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेतील शेवटचा आणि महत्त्वपूर्ण टप्पा असतो. उमेदवाराचे अंतिम यादीतील स्थान निश्चित करण्यात हा टप्पा निर्णायक ठरू शकतो. म्हणूनच यात जास्तीत जास्त गुण मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवणे अत्यावश्यक आहे. यूपीएससीने २७५ गुणांसाठी तर एमपीएससीने १०० गुणांसाठी मुलाखतीचा अंतिम टप्पा निर्धारित केलेला आहे. लोकसेवा आयोगाने मुलाखतीस 'व्यक्तिमत्त्व चाचणी' असे संबोधले आहे. मुलाखतीचा हेतू उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व सनदी सेवा पदासाठी सक्षम आहे किंवा नाही याची तपासणी करणे होय. व्यक्तिमत्त्वाची सर्व अंगे मुलाखतीमध्ये विचारात घेतली जातात. व्यापक अर्थाने मुलाखतीत उमेदवाराच्या ज्ञानाची कसोटी घेतली जाते, असे नाही तर आपल्या भोवताली घडणाऱ्या महत्त्वपूर्ण घटना-घडामोडी याविषयी उमेदवाराची भूमिका व मत काय आहे, याची तपासणी केली जाते.
मुलाखत मंडळातील अनोळखी सभासदांसमोर तुम्ही किती सहजपणे वागू शकता आणि स्वतला किती आत्मविश्वासपूर्वक सादर करू शकता, याची चाचणी मुलाखती दरम्यान होत असते. तुमच्या सभोवती घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनांबाबत तुम्हाला माहिती आहे का? जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांमधील विविधांगी वास्तवाशी तुम्ही किती परिचित आहात? या घडणाऱ्या घटनांसंबंधी तुम्हाला मत आहे का? त्याचे स्वरूप काय? या माहितीच्या आधारावर तुमची सर्वसाधारण जाणीव कशी आहे, हे मुलाखती दरम्यान बघितले जाते. एकंदर उमेदवाराची स्पष्ट व ताíकक विचार करण्याची क्षमता, मत व्यक्त करण्यातील समतोल, आवडीच्या गोष्टीमधील सखोलता आणि महत्त्वपूर्ण विषयांसंदर्भातील ज्ञान याबरोबरच त्याचा आत्मविश्वास, निर्णयक्षमता, आपत्कालीन परिस्थितीस सामोरे जाण्याची क्षमता इ. गुणवैशिष्टय़े तपासली जातात.
मुलाखत मंडळ
मुलाखतीसाठी मुलाखत मंडळामध्ये आयोगाचे अध्यक्ष/ज्येष्ठ सदस्य + वरिष्ठ अधिकारी (पोलीस/इतर खाती)/सनदी अधिकारी आणि ज्येष्ठ प्राध्यापक असतात. मुलाखतीविषयी विद्यार्थ्यांमध्ये पुष्कळ पूर्वग्रह दिसून येतात. ते असे की, उत्तम शैक्षणिक आलेख असले तरच चांगले गुण मिळतात. मुलाखत मंडळ हे जणू सापळाच रचून बसलेले असते. मुलाखत मंडळाने विचारलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरे यायला हवीत. अस्खलित इंग्रजीत संवाद साधल्यासच चांगले गुण मिळतात. मुलाखतीसाठी वशिला लावावा लागतो. अशा एक ना अनेक शंकाकुशंका स्पर्धकांच्या मनात घर करून असतात. म्हणूनच कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय मुलाखतीला सामोरे जाणे हा गुण मिळविण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. मुलाखत मंडळे ही कोणाशीही पूर्वग्रहाने वागत नसतात. कारण त्यांच्यासाठी तुम्ही फक्त एक स्पर्धक असता.
'मुलाखत' याचा शब्दश: अर्थ म्हणजे व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व समोरासमोर खुले करणे. मुलाखतीमध्ये विषयातील ज्ञानाऐवजी उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाची चाचणी घेतली जाते. व्यक्तिमत्त्वाची सर्व अंगे मुलाखतीमध्ये विचारात घेतली जातात. मुलाखतीद्वारे उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे मुलाखतीचा नेमका अभ्यास करताना स्वतच्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक पलू सादर करणे आवश्यक ठरते.
मुलाखतीतील घटक
उमेदवाराला मुलाखतीची तयारी करताना पुढील घटकांचा सविस्तर अभ्यास करावा लागतो. यातील विशेषत वैयक्तिक माहिती, पदांचा पसंतीक्रम, पदवीचा विषय, त्याचा दैनंदिन जीवनातील वापर, छंद, नोकरीचा अनुभव आणि भोवताली घडणाऱ्या घडामोडी या घटकांची पुढीलप्रमाणे तयारी करावी लागते-
(१) व्यक्तिगत माहिती - मुख्य परीक्षेचा अर्ज भरताना उमेदवाराला आपली संपूर्ण व्यक्तिगत माहिती नमूद करावी लागते. हा 'बायोडाटा'च पायाभूत मानून त्यातील प्रत्येक घटकाची तयारी करावी. यात उमेदवाराचे स्वतचे नाव, आई-वडिलांचे नाव आणि आडनावासंबंधी माहिती संकलित करावी. आपल्या नावाचा विशिष्ट अर्थ असल्यास तो लक्षात घ्यावा. तसेच आपल्या नावाची एखादी व्यक्ती इतर क्षेत्रात सुप्रसिद्ध असल्यास तिच्याविषयी थोडक्यात माहिती संकलित करावी.
(२) वास्तव्य - विद्यार्थ्यांनी मूळ ठिकाण, सध्याचे ठिकाण, तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य असे वर्गीकरण करावे. यातील प्रत्येक घटकाचा थोडक्यात इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था, राजकारण, अर्थकारण, इतर काही महत्त्वाची वैशिष्टय़े यासंबंधी तयारी करणे अत्यावश्यक ठरते.
(३) शैक्षणिक पाश्र्वभूमी - उमेदवाराची शैक्षणिक पाश्र्वभूमी हा आणखी एक महत्त्वपूर्ण घटक आहे. यात अगदी शालेय शिक्षणापासून, माध्यमिक, उच्चमाध्यमिक, महाविद्यालयीन आणि पदवी-पदव्युत्तर शिक्षणापर्यंतची माहिती निर्णायक ठरते. विशेषत: पदवी शिक्षण आणि त्यातील विशेषत्व ही बाब महत्त्वाची मानावी. ज्या शाखेत आणि विषयात पदवी संपादन केली आहे त्यातील पायाभूत संकल्पना, विचार आणि उपयोजनात्मक भाग यावर लक्ष केंद्रित करावे. शिक्षण संस्थांची नावे आणि ठिकाणे यासंबंधीदेखील प्रश्न विचारले जाऊ शकतात हे लक्षात घेऊन त्यासंबंधीही माहिती प्राप्त करावी.
(४) अभ्यासबाह्य़ गोष्टींमधील रस - उमेदवाराच्या व्यक्तिगत माहितीतील 'अभ्यासबाह्य़ बाबींतील रस' हा घटकही महत्त्वपूर्ण ठरतो. यात विद्यार्थ्यांचा छंद, क्रीडा प्रकारातील रस, विविध स्पर्धात प्राप्त केलेली पारितोषिके, बक्षिसे अशा अभ्यासबाह्य़ घटकांचा समावेश होतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने या घटकाची प्रभावी तयारी करणे मध्यवर्ती ठरते. अशा रीतीने उपरोक्त विविध घटकांची सविस्तर माहिती संकलित करून त्यावर आधारित अधिकाधिक 'मॉक इंटरव्ह्य़ू'चा सराव केल्यास अधिक गुण मिळवता येतील.
(५) वैकल्पिक विषय - यूपीएससी मुख्य परीक्षेसाठी उमेदवाराने निवडलेल्या वैकल्पिक विषयासंदर्भात देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्या विषयातील संकल्पना, विचार-सिद्धांत, विचारवंत, समकालीन आयाम इत्यादी घटकांचा अभ्यास करावा.
(६) चालू घडामोडींविषयी माहिती - आपल्या भोवताली घडणाऱ्या चालू घडामोडींविषयीही अनेक प्रश्न विचारले जातात. राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळी आणि सामाजिक, राजकीय, आíथक, सांस्कृतिक, विज्ञान-तंत्रज्ञान, क्रीडा अशी विभागणी करून त्यासंबंधी महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर तयारी करावी. चच्रेतील मुद्दय़ांचे स्वरूप, कारणे, त्यातून निर्माण होणारे प्रश्न, संभाव्य उपाय इ. आयामांसंबंधी तयारी करावी. संबंधित मुद्दय़ांविषयी जी प्रचलित मतमतांतरे आहेत, त्याची माहिती उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे. या महत्त्वाच्या, कळीच्या मुद्दय़ांविषयी स्वत:चे मत असणे महत्त्वाचे ठरते.
(७) पदांचा पसंतीक्रम - पदांच्या पसंतीक्रमाबाबत योग्य स्पष्टीकरण देता यावे. आपले व्यक्तिमत्त्व व आजूबाजूची परिस्थिती यांची आपल्या पसंतीक्रमाशी सांगड घालता आली पाहिजे. अर्थात यावेळीसुद्धा यशस्वी उमेदवारांनी दिलेल्या उत्तरांची पुनरावृत्ती करण्याचा मोह टाळावा. 'आपले पूर्वायुष्य व आलेले अनुभव यातून प्रशासकीय अधिकारी बनण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण झाली,' नेमक्या या कारणांचा समावेश आपल्या उत्तरात असावा. दिलेल्या पसंतीक्रमांतील पदांची नेमकी माहिती, त्यांचे अधिकार, कर्तव्य, प्रशासनातील त्या पदाची नेमकी भूमिका याबाबत आपणास प्रश्नांना सामोरे जावे लागते. या पदांशी संबंधित सामाजिक व प्रचलित घडामोडींचे ज्ञान अपेक्षित असते.
(८) नोकरीविषयक माहिती - एखादा उमेदवार नोकरी करत असल्यास त्याविषयक सविस्तर तयारी करणे अत्यावश्यक ठरते. नोकरीचे कार्यक्षेत्र, पदाची काय्रे व जबाबदारी, त्यासंबंधी तांत्रिक माहिती, त्यातील समस्या व आव्हाने आणि उपाययोजना या बाजूंबरोबरच नोकरीचा एकंदर अनुभव याविषयी नेमका अभ्यास करणे गरजेचे ठरते.
प्रत्यक्ष मुलाखतीस जाताना
मुलाखतीची संकल्पना आणि मुलाखतीची तयारी करताना विचारात घ्याव्या लागणाऱ्या बाबी पाहिल्यानंतर प्रत्यक्ष मुलाखतीस कशाप्रकारे सामोरे जावे, याबाबत चर्चा करता येईल. मुलाखतीस प्रत्यक्षपणे सामोरे जाताना पुढील गोष्टींकडे आवर्जून लक्ष पुरवावे.
प्रथम गोष्ट म्हणजे तुमचा पेहराव. कारण त्यावरून तुमची आवडनिवड, आचारविचार समजत असतात. तेव्हा पोषाख हा औपचारिक, साधा मात्र नीटनेटका असावा. स्वच्छ, इस्त्री केलेला व स्वत:स शोभून दिसणारा असावा. मुलांनी शक्यतो शर्ट-पँट व टाय तर मुलींनी सलवार-कमीज अथवा साडी परिधान करावी. आपण कोणत्याही समारंभाला चाललेलो नाही, याचे भान ठेवून सौंदर्यप्रसाधनांचा कमीत कमी वापर करावा.
(२) दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कोणतीही धावपळ होऊ नये, म्हणून मुलाखतीच्या नियोजित वेळेआधी नियोजित जागेवर पोहोचावे. मुलाखतपत्रात वेळ दिलेली असते, तेव्हा तत्पूर्वी तुम्ही तेथे हजर
राहा.
(३) जेव्हा तुम्ही मुलाखत कक्षात पोहोचाल तेव्हा कितीही काळजी, चिंता वाटत असली तरी आपल्या भावनांवर ताबा ठेवा, शांत राहण्याचा प्रयत्न करा व सर्वाना अभिवादन करा. जेव्हा तुम्हाला बसण्यास सूचित करण्यात येईल, तेव्हा बसा. कारण तुमची मुलाखत काही उभी राहून घेतली जाणार नाही, तेव्हा शांत राहा.
(४) तुम्ही शांत राहण्यासोबतच आत्मविश्वासानेही बोला. मुलाखत मंडळ तुम्हाला काही बाहेर काढण्यासाठी नव्हे तर तुमची निवड करण्यासाठी तेथे बसलेले असते. जर तुम्ही आत्मविश्वासाने उत्तरे देत असाल तर त्याचा नक्कीच अनुकूल प्रभाव पडत असतो.
(५) उत्तरे देताना मुलाखत मंडळातील सर्वाकडे पाहून उत्तरे देण्याचा प्रयत्न करा.
(६) तुमच्या आत्मविश्वासाबरोबर नम्रपणाही दिसून येणे महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही नजरेत नजर घालून उत्तरे द्याल तेव्हा तुमचा आत्मविश्वास दिसून येईल. त्याचप्रमाणे तुमच्या उत्तर देण्याच्या पद्धतीवरूनदेखील तुमचा नम्रपणा जोखता येतो.
(७) मुलाखत मंडळाच्या सदस्यांचा आदर राखा. त्यांच्या अनुभवाचा मान राखा व उलट
उत्तरे देऊ नका. अथवा उलट प्रश्न विचारू नका, शिवाय संलग्न अथवा अतिशयोक्त उत्तरे देऊ नका. जर माहिती नसेल तर
तसे स्पष्ट सांगा, मात्र चुकीची माहिती
देऊ नका. अन्यथा त्याचा नकारात्मक परिणाम संपूर्ण मुलाखती दरम्यान दिसून येऊ शकतो.
(८) तुमच्या उत्तरासोबत तुमचा आवाजही तितकाच महत्त्वाचा असतो. सहजपणे व स्पष्टपणे ऐकू जाईल अशा पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करा. अर्थात तुमच्या बोलण्यात ठामपणा व निर्धार असावा.
मुलाखतीत स्वत:च्या व्यक्तिगत माहितीतून निर्माण होणारे प्रश्न जसे महत्त्वाचे असतात,
तसेच भोवताली घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनांविषयीचे उमेदवाराचे मत व भूमिकाही महत्त्वाची ठरते. भारतीय राज्यघटना, प्रशासनाची चौकट आणि आपल्या समाजातील सामाजिक, आíथक वास्तव यांचे भान ठेवूनच उमेदवाराने मुलाखत मंडळासमोर आपले व्यक्तिमत्त्व सादर करणे अपेक्षित असते. प्रामाणिकपणा, संवेदनशीलता, जिज्ञासा, प्रतिसाद, आत्मविश्वास, निर्णय-निर्धारण क्षमता आणि हजरजबाबीपणा अशा महत्त्वाच्या गुण वैशिष्टय़ांची तपासणी म्हणजे 'व्यक्तिमत्त्व चाचणी होय' हे लक्षात घेऊनच उमेदवाराने मुलाखतीच्या तयारीची रणनीती आखावी.

the article is from LOKSATTA

No comments:

Post a Comment