Wednesday 8 May 2013

नवजात अर्भक मृत्यूमध्ये भारत पहिला

जन्म घेतल्यानंतर 24 तासांतच मृत्यू पावणाऱ्या अर्भकांची संख्या भारतात तब्बल 3 लाख असून, जगभरात ही संख्या सर्वांत जास्त आहे.
"सेव्ह द चिल्ड्रन' या स्वयंसेवी संस्थेने यासंदर्भात पाहणी केली आहे. संस्थेच्या पाहणी अहवालानुसार, जगभरात होणाऱ्या नवजात अर्भकांच्या मृत्यूच्या प्रमाणात भारतातील अर्भकांचे प्रमाण 29 टक्के आहे. या संशोधनासाठी 186 देशांत पाहणी करण्यात आली. जगाच्या लोकसंख्येपैकी 24 टक्के लोक दक्षिण आशियात राहतात. याच दक्षिण आशियात पहिल्याच दिवशी मृत्यू पावणाऱ्या अर्भकांची संख्या 40 टक्के आहे. नवजात अर्भकांच्या मृत्यूमध्ये भारताखालोखाल बांगलादेश आणि पाकिस्तानचा क्रमांक लागला आहे. बांगलादेश व पाकिस्तानात दरवर्षी अनुक्रमे 28 हजार व 60 हजार नवजात अर्भकांचा पहिल्याच दिवशी मृत्यू होतो. या विभागात होणाऱ्या बालमृत्यूचे वाढते प्रमाण हे मातांच्या कुपोषणामुळे असल्याचे अहवालात म्हटले आहे.
बालमृत्यूची प्रामुख्याने तीन कारणे संशोधकांना आढळली आहेत. यातील प्रसूतीच्या वेळी होणारी गुंतागुंत, वेळेआधी झालेली प्रसूती आणि संसर्ग, ही तीन कारणे यामागे आहेत. कमी खर्चाच्या जीवरक्षक यंत्रणेद्वारे हे प्रमाण 75 टक्के कमी करता येणे शक्‍य आहे. राजकीय इच्छाशक्ती आणि माता व अर्भकांपर्यंत ही मदत पोचविण्यात येणारे अडथळे, या गोष्टींचा अडसर यात आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रगती होत असताना गरीब व ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्यावरील खर्च वाढविणे भारताला शक्‍य आहे. हा खर्च वाढविण्यात आला, तरी तो गरजूंपर्यंत पोचत नाही, असे अहवालात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment